वर्धा : वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो ४० फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भाजपा आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. रहांगडाले यांना पुत्रशोक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन सर्वांची भेट घेतली. यावेळी आमदार रहांगडाले यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे पाहायला मिळाले.
वर्धा-देवळी मार्गावर मागील मंगळवारी झालेला अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आपघातानंतर रहांगडाले यांना सांत्वन भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरी भेट देत आहेत. रविवारी नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबियांची सपत्नीक भेट घेतली.
गडकरी आणि रहांगडाले कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहे. त्यामुळेच गडकरींना पाहताच विजय रहांगडाले ओक्साबोक्शी रडू लगाले. त्यांना अपघातासंदर्भातील माहिती विजय रहांगडाले यांनी दिली. विजय रहांगडाले यांची भेट घेतल्यानंतर गडकरींनी त्यांच्या पत्नीही भेट घेतली. “खूप मोठं संकट आहे,” असं म्हणत गडकरींनी विजय रहांगडाले यांच्या पत्नीला नमस्कार केला. “खरं तर हा धक्काच आहे,” असंही गडकरी विजय रहांगडाले यांचं सांत्वन करताना म्हणाले.
रहांगडाले कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गडकरींनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अपघात कसा झालाय त्यासाठी चौकशी करण्यासाठी समिती तयार केली असून तांत्रिक कारण, तसेच रोड इंजिनियरचे कारण तर अपघातामागे नाही ना. त्याचप्रमाणे कार सदोष असल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना या सगळ्यांची चौकशीचे आदेश दिले आहेत.”
“रस्ते सुरक्षततेबद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात मृत्यू पावतात. तमिलनाडू सरकारने त्यांच्या राज्यातील ५० टक्के अपघातांवर नियंत्रण मिळविले असून तेथे अपघात मृत्यूचं प्रमाण देखील ५० टक्क्यांनी कमी झालंय. महाराष्ट्रात कशाप्रकारे अपघात आम्ही टाळू शकतो याच्या उपाययोजना करणे गरजचे आहे,” असंही गडकरी म्हणाले.
“वर्धा येथे झालेले अपघात ही घटना खूप दुर्देवी आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत म्हणून आज इथे आपल्या परिवारासोबत मी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या मुलांच्या आत्म्याला परमात्मा शांति देवॊ व कुटुबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे अशीच प्राथना करतो,” असे गडकरी म्हणाले.