पालघर: नालासोपारा शहरात शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनीच आपल्या पोटच्या तीन मुलांची गळा चिरून हत्या करत स्वत: आत्महत्या केली. या घटनेने संपर्ण शहर हादरले आहे.
कैलास परमार (वय 35) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कैलास परमार हे नालासोपाऱ्यात आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. परंतु दीड महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी घर सोडून गेली आणि ती वेगळी राहत होती.
शनिवारी रात्रीच्या सुमारास कैलास यांनी आपल्या 12 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय आणि 3 वर्षीय मुलीची गळा चिरून हत्या केली. तिन्ही मुले झोपले असताना कैलास यांनी त्यांची हत्या केली. यानंतर कैलास यांनी स्वत: देखील आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास याने सर्वप्रथम पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरल्याने चाकूने वार करत स्वत:चे जीवन संपवले. या संपूर्ण घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी कैलासच्या घरातून धारदार चाकू जप्त केला आहे.
दरम्यान, कैलास परमारचे वडील विजू परमार यांनी दावा केला आहे की, पत्नी घर सोडून गेल्याने तो खूपच नैराश्यात होता. सोशल मीडियात पत्नीचा फोटो पाहून कैलास खूपच अस्वस्थ झाला होता.