मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील बसचा लगाम मार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात वाहकासह काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.
अहेरी आगारातून शालेय विद्यार्थ्यांकरिता मानव मिशन विकास अंतर्गत बसेस चालवण्यात येतात. सकाळी अहेरी-लगाम-मुलचेरा परिसरातील विध्यार्थ्यांना घेऊन जाणारी एमएच ०७ सी ९४६५ क्रमांकाची बस नाल्याजवळ अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
अपघातात वाहक व काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरजागड खाणीतील लोहखनीजाच्या वाहतुकीमुळे या भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे इतर वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहे.