दौंड – टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर, सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना दौंड व भिगवण येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सुरेखा बाळू पानसरे, रेश्मा भाऊसो पानसरे, अश्विनी प्रमोद आटोळे अशी मृत महिलांची नावे आहेत. तर इंदुबाई बाबासाहेब आटोळे, मीना बापू आटोळे, अनिता धनाजी साळुंखे, आक्का सुदाम साके, कावेरी माणिक आटोळे, उषा राजेंद्र आटोळे या महिला जखमी अवस्थेत आहेत. मृत महिलांमध्ये दोघी सख्ख्या जावा आहेत.
सर्व महिला रोजंदारीचे काम करत होत्या. गुरुवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजता टोमॅटोने भरलेला ट्रॅक्टर शेतातून बाहेर काढत असताना खडकवासला धरण कालव्याच्या 32फाट्यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॉलीत बसून निघालेल्या महिला या ट्रॉलीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. टोमॅटोचे 75 ते 80 क्रेट यामध्ये होते. अपघातग्रस्त महिला रावणगाव परिसरातील बंगाल वस्ती या परिसरातील होत्या.