उत्तम पिंगळे
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही, वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा मी काय म्हणतो ते नीट ऐक. फक्त तू मध्ये बोलणार नाहीस. जर तू मध्येच बोललास तर मी पुन्हा झाडावर निघून जाईन.
वेताळ सांगू लागला, विक्रमा मला एक सांग तुम्ही उपवास करता म्हणजे नक्की काय करता? आता तू म्हणशील की हा प्रश्न नेमका आत्ताच कशाला तू विचारत आहेस, पण आताच महाशिवरात्र साजरी केली गेली म्हणून म्हणतो. मला तर उपवास म्हणजे काहीही न खाणे असा सोपा अर्थ समजतो. पण येथे उपवासाच्या नावाखाली काय काय पदार्थ खाल्ले जात आहेत ते मी पाहात आहे. तुमच्या महाराष्ट्र प्रदेशातील तर मला अनेक गोष्टी माहीत आहेत व मला त्यातील गाणेही माहीत आहे.
“हा उपास मज लागला, केळीनी खजूर आणला. खारका मोजल्या तीस, उकडले बटाटे वीस…’ असे ते गाणे होते. आता मला सांग की हे असे सर्व खायचे व मग अभिमानाने मी उपवास करतो म्हणून सांगायचे मला तर काही कळतच नाही. बरं वेगवेगळे पदार्थ बाजारातही मिळू लागले आहेत जसे उपवास भाजणी अगदी उपवासाची मिसळ वगैरे म्हणजे याला उपवास म्हणायचा का? असे सर्व खाऊन उपवास होतो का? आणि त्यातूनही जे खरोखर उपवास करतात त्यांचे काय? मला हा प्रश्न केव्हापासून पडला आहे. मग विक्रम म्हणाला, हे वेताळा तू म्हणतो ते अगदीच चुकीचे नाही. खरोखरचा उपवास म्हणजे काही कालावधीकरिता अन्न व पेय वर्ज्य करणे होय. पूर्वी ऋषी-मुनी असे करत असत व आजही काही लोक तसे करतही आहेत. पण अलीकडच्या जीवनशैलीमुळे पूर्णपणे लंघन करणे काहींना जमत नाही. आता मला जे समजते ते मी सांगतो.
महाशिवरात्री, एकादशी अशा प्रकारचे सण असतात आशा वेळी आपण खास कारण म्हणून देवादिकांचे पूजन करतो. अशा वेळी उपवास केल्यास उत्तमच पण किमान सात्विक खाणे तरी असावे. कारण आपण जसे खातो तशी आपली वृत्ती असते असे आमचे पूर्वज सांगतात. मग त्यांनी असे पदार्थ वेगळे केले की जे उपवासाला चालतात. आता ऋषीचं कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये म्हणून आधीच बचावतो. हे असेच का? शेंगदाणा चालतो पण शेंगदाणे तेल काहींना चालत नाही असे बाष्कळ प्रश्न विचारू नकोस. जे सांगतोय ते गोड मानून घे. मग पुढे लोक हळूहळू असे पदार्थ थोडे ग्रहण करून पूजा अर्चा करू लागले आणि त्याला उपवासही म्हणू लागले. म्हणजे उपवासाला चालणारे पदार्थ खाल्ले तरीही उपवास झाला असे लोक म्हणू लागले. आता ते कोणते पदार्थ घ्यावेत व किती प्रमाणात घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.आणि मग उपवासाच्या पदार्थांची संख्या हळूहळू वाढू लागली.
वैज्ञानिकदृष्ट्या आता पाहिले तर उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे जमणाऱ्या कॅलरीज् व इतर दिवशी खाण्याच्या पदार्थामुळे जमणाऱ्या कॅलरीज् यात बरीच तफावत असून उपवासाच्या दिवशी उलट जास्त कॅलरीजचे पदार्थ खाल्ले जातात हे वास्तव आहे. पूर्वी ऋषी-मुनी फक्त फलाहार किंवा दूध घेत असत. आजच्या धकाधकीच्या जीवनात मागणी असल्यामुळे रेडिमेड पदार्थही सहज मिळू लागले आहेत. उलट त्यामुळे काहींच्या संसाराला हातभारच लागत आहे. शेवटी कोणत्याही देवाने उपवास करा असे सांगितलेले नाही. आपण शुद्ध अंतःकरणाने पूजा करणे महत्त्वाचे आहे व त्याचवेळी काही सात्विक पदार्थ ग्रहण केले तरी ठीक असे मानणारे लोकही आहेत. अर्थात, “अति सर्वत्र वर्जयेत्’ त्याप्रमाणे उपवास वाटला तरी पाहिजे असेच मी सांगेन.
विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ म्हणाला, हे राजा तू म्हणतोस ते मला पटले. पण राजा तू बोललास त्यामुळे हा मी निघालो, असे म्हणून वेताळ प्रेतासह पुन्हा पिंपळाच्या झाडावर जाऊन लोंबकळू लागला.