पुणे – टोलनाक्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची खेड शिवापूर, आनेवाडी-सातारा आणि तासवडे-कराड येथील टोल संचालक, यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार फास्टॅग नसणाऱ्या अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला.
परिणामी, या सर्व टोलनाक्यांवर वाहनधारकांनी टोलनाका कर्मचायांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याने वादाची परिस्थिती निर्माण झाली. वाहनधारक आणि टोलनाका कर्मचारी यांच्यातील वाद मिटवता मिटवता वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत होती. कराडजवळच्या तासवडे टोलनाक्यावर आपल्या वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी केली होती. फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांमुळे टोलनाक्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
टोलनाक्यावरील कारभारात पारदर्शकता यावी तसेच वाहनधारकांचा टोलनाक्यावरील वेळ व इंधनाची बचत व्हावी यासाठी देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग लेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊन फास्टॅग बसविण्याबाबत वाहनधारकांत जागृती केली होती. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही अनेकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मंगळवारपासून दुप्पट टोल वसूल करण्याच्या शासन निर्णयाची टोल व्यवस्थापन यंत्रणेने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
दुप्पट टोल वसुली प्रक्रियेमुळे वाहनधारक व टोल यंत्रणा यांच्यात वादावादीसह अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टोलनाक्यावर दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे फास्टॅग नसणाऱ्या अनेकांना निमूटपणे दुप्पट टोल भरावा लागला. दरम्यान, फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना यापुढे कोणत्याही लेनमधून प्रवास करताना दुप्पट टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वाहनधारकांनी टोलनाक्यावरील आपला वेळ व इंधन वाचविण्यासाठी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावे, तसेच आपला टॅग ऍक्टिव्ह असल्याचे पाहूनच टोलनाक्यावरून प्रवास करावा असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.