अडचणींचा डोंगर : टोलनाक्यांवरील यंत्रणा कूचकामी
पुणे – राष्ट्रीय महामार्गांवरील सर्वच टोलनाक्यांवर “फास्टॅग’ सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, अनेक वाहनांना “फास्टॅग’ लावलेला असताना कित्येकदा तो स्कॅन न झाल्याने वाहनचालकांना रोख रक्कम भरावी लागत आहे. या प्रकारात तांत्रिक अडचणी असल्याने वाहनचालकांची कोणतीही चूक नसते. त्यामुळे, “फास्टॅग’ स्कॅन न झाल्यास मोफत वाहने सोडावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेने केली आहे.
देशातील अनेक टोलनाक्यावर पायाभूत सुविधा, तांत्रिक अडचणी जाणवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी “फास्टॅग’चा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागून गोंधळाचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश मालवाहतूक वाहनांना “फास्टॅग’ दिसत आहे. मात्र, वाहनचालक अथवा वाहन मालकाच्या खात्यावर पैसे असूनही “फास्टॅग’ स्कॅन होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात, आर्थिक कारभारात पारदर्शकता यावी, या उद्देशाने “फास्टॅग’ बंधनकारक केल्याने बहुतांश वाहनांना “फास्टॅग’ बसवून घेतले आहे. मात्र, टोलनाक्यावर अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. कित्येक टोलनाक्यावर तांत्रिक अडचणी येत असल्याने वाहनांना मोफत सोडण्यात यावे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व संबंधित मंत्र्यांना निवेदन देण्यात आल्याचे राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.