नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. मात्र, संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, महंमद शमी व दीपक चहर असे पर्याय असताना मला खेळण्याची संधी मिळणे खूपच कठीण वाटत आहे, असे मत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केले आहे. ही स्पर्धा खेळण्याची खूप इच्छा आहे पण वस्तूस्थिती पाहता मला संधी मिळणार नाही हे उघड आहे, असेही तो म्हणाला.
गेल्या काही मालिकांमध्ये संघातील प्रत्येक गोलंदाजाने सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भुवी, बुमराह, शमी यांनी तर जागतिक दर्जाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघात फार बदल होतील असे वाटत नाही. त्यातही शमी या स्पर्धेसाठी उपलब्ध असेल तर भुवी, बुमराह व शमीलाच अंतिम संघात स्थान मिळेल. कर्णधार विराट कोहली एकाच वेळी चार वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार नाही, असेही मत उमेशने व्यक्त केले.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव हे दोन फिरकी गोलंदाज, तर वेगवान गोलंदाजात हे चार खेळाडू असे पर्याय असताना कोहली मलाही संधी देईल अशी मला अपेक्षा नाही. या स्पर्धेत संघात एकाच वेळी जास्तीत जास्त तीन वेगवान गोलंदाज खेळवले जाईल अशी मला खात्री आहे.