सिडनी – भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जायबंदी झाल्यामुळे नवोदीत वेगवान गोलंदाज टी. नटराजन एक अनेखा विक्रम साकार करण्यासाठी सज्ज बनला आहे. कारकिर्दितील पहिल्याच दौऱ्यात क्रिकेटच्या तीनही प्रकारात पदार्पण करणारा नटराजन पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात नटराजनला संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला तेव्हा नटराजन केवळ नेट गोलंदाज म्हणून निवडला गेला होता. पण एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या लढतीत नवदीप सैनी दुखापतीमुळे बाहेर गेला आणि नटराजनला संधी मिळाली.
या संधीचे सोने केल्यामुळे त्याला टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने या मालिकेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर कसोटी मालिकेला प्रारंभ झाला. प्रथम महंमद शमी तर नंतर उमेश यादव व आता बुमराहलाही दुखापत झाल्यामुळे नटराजनचा कसोटी संघातील समावेश निश्चित समजला जात आहे. येत्या शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याद्वारे तो कसोटी पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
भारतीय संघाच्या निवड समितीने यादवच्या जागी नटराजनची तर, शमीच्या जागी शार्दुल ठाकूर यांचीही निवड केली आहे. आता अंतिम 11 खेळाडूंमध्ये या दोघांनाही स्थान मिळणार का हे लवकरच जाहीर केले जाणार आहे.