फोरोची अनोखी स्वप्ने आणि निराशावादी पूर्वग्रह! (भाग-1)
अर्थशास्त्रातील एक आर्थिक सिद्धांत दर्शवितो की मालमत्तेच्या किंमती व ऐतिहासिक परतावा हा अखेरीस त्यांच्या दीर्घ मुदतीच्या किंवा सरासरी पातळीवर परत येतात. गुंतवणूकीमधील बहुतेक सर्व गोष्टींचा कल हा कालांतरानं त्यांच्या सरासरीकडंच परतताना दिसतो मग तो इक्विटीवरील परतावा असो, पीई रेश्यो असो किंवा व्याजदराचा दर असो.मागील कांही वर्षांत, भारतातील व्याज दर ५ ते ९ टक्क्यांदरम्यान कमी-जास्त झालेले पहायला मिळतात, प्रमुख निर्देशांकाचा पीई १० ते ३० या पटींत हालताना आढळतो तर पूर्वी १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत पोहोचलेलागुंतवणुकीवरील परतावा (ROI) सध्या आतापर्यंतच्या तळात म्हणजे १०% आहे. दुर्दैवानं, एक गुंतवणूकदार म्हणून आमचा कल मात्र अगदी याच्या उलट असतो.
उदाहरणार्थ, इ.स. २००० मध्ये आम्हाला असं वाटलं होतं की माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कायम वाढतच जातील आणि त्याचप्रमाणे २००८ मध्ये पायाभूत सुविधा कंपन्यांचे. अगदी त्याच भावनेनं सध्याच्या एनबीएफसी कंपन्यांबद्दलचा निराशावादी पूर्वग्रह अगदी सहज बदलताना दिसून येत नाहीय. २०१३ मध्ये, सोन्याच्या किंमती वाढतच जातील आणि शेअरबाजार हा २०१० पासून जसा स्थिर होता तसाच राहील असा सर्वांचा अंदाज होता. शेअर्सच्या बाबतीतही, असे कांही दीर्घ कालावधी असतात जेंव्हा वाढणारे शेअर्स चांगला परतावा देतात व नंतर मूल्यवर्धीत कंपन्यांच्या शेअर्सची वेळ असते. परंतु या सिद्धांताप्रमाणं आम्ही अशा ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणं थांबवतो जे सध्या आकर्षक वाटत आहेत कारण एक प्रकारे आम्ही भूतकाळपासून शिकण्यास नकार देत असतो.
आजच्या काळापुरतं मोजमाप करण्यापेक्षा आपण दीर्घकालीन वास्तविकतेचा आणि महत्त्वपूर्ण वळण बिंदूचा आदर केला पाहिजे. गुंतवणूकीबाबत आम्ही हे कसं लागू करू शकतो ? योसेफानं फारोला सांगितल्याप्रमाणं, सुकाळी (येणाऱ्या) वाईट दिवसांसाठी २० टक्के धान्य साठवून ठेवलं त्याचप्रमाणे, जेंव्हा एखादा ॲसेट क्लास (सध्याचंच उदा. म्हणजे सोनं) खूप चांगला परतावा देत असेल व जर तो तुलनात्मकदृष्ट्या त्याच्या उच्चांकाजवळ असेल तर तेंव्हा त्यातूनच, (येणाऱ्या) वाईट टप्प्यासाठी तयारी करणं आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा दुसरा एखादा ॲसेट क्लास योग्य संतुलन राखून जोडणं केंव्हाही हितकारकच. मागील एका वर्षात सोन्याच्या किंमती ३१००० वरून थेट ४०००० झालेल्या आहेत. आता ४० हजारांच्या वर क्रमाक्रमानं त्यांतील २५-३०% गुंतवणूक काढून ती चांगल्या ठिकाणी गुंतवल्यास म्हणता येईल सोन्याहून पिवळं.
अभ्यास असं सांगतो की प्रत्येक वर्षी आपला पोर्टफोलिओ हा पुनर्संतुलित करावा म्हणजेच जोखीम तपासून वयोमानानुसार व आपल्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसार संपूर्ण गुंतवणुकीच्या कमीतकमी ३०% गुंतवणूक ही रोख्यांमध्ये किंवा स्थिर उत्पन्न देणाऱ्या ॲसेट क्लासमध्ये असावी. जाता जाता महत्त्वाचा सल्ला म्हणजे आपला योसेफ म्हणजे एक चांगला आर्थिक सल्लागार शोधून ठेवा, ज्यानं अशा अनेक तेज्या-मंद्या पहिल्या आहेत आणि जो आपणांस तर्कसंगत दीर्घकालीन गुंतवणूकदार बनण्यास मदत करू शकेल. तथापि, आजचा योसेफ जरी आपल्या स्वप्नांचा अर्थ लावू शकत नाही, परंतु ती पूर्ण करण्यास निश्चितच तो आपल्याला मदत करू शकेल.