मुंबई – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी कलम ३७० पुन्हा लागू करण्यावर भाष्य केले. यावर फारूख अब्दुल्लांनी हवे असल्यास पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
जम्मू-काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हंटले होते. फारुख अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले कि, आता देशातील कोणतीही शक्ती काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० आणू शकणार नाही. फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये जाऊन ३७० कलम लागू करायचेय का, हे विचारले पाहिजे.
तसेच कलम ३७० रद्द झाल्यामुळे देशाच्या इतर भागातील उद्योजकांना काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काश्मीरमध्ये उद्योग क्षेत्राला गती येईल. येथील लोकांना रोजगार मिळतील, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते फारुख अब्दुल्ला?
नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यक्रमात फारुख अब्दुल्ला यांनी म्हणाले कि, जे लोक आम्हाला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्हाला पाकिस्तानात जायचे असते तर १९४७ मध्येच गेलो असतो.परंतु, हा आमचा भारत आहे. महात्मा गांधी यांचा भारत आहे. जम्मू-काश्मीरचा जुना दर्जा पुन्हा मिळत नाही तोवर आपण मरणार नाही.