मुंबई – जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले काही केल्या संपत नाहीत. इथले हत्या सत्र अजूनही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण जम्मूच्या कुलगामच्या गोपालपुरा येथे मंगळवारी संशयित दहशतवाद्यांनी एका पंडित महिलेवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शिक्षिका महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. तसेच काश्मीर पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, या घटनेवर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांकडून फारुख अब्दुल्ला यांनी हिंदू महिला शिक्षकाच्या हत्येबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ‘सब मारे जाएंगे.’ त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
तर जम्मू काश्मीरमधील “पीडीपी’च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या,’भारत सरकार काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत आहे. असे असतानाही नागरिकांचे बळी जात आहेत. ही चिंतेची बाब आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, ‘मी या भ्याड कृत्याचा निषेध करते.’