पेठ (पुणे) – येथील परिसरात आज (दि. 19) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे बटाटा शेतात तळे साचले होते, याचबरोबर शेतात आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहत असल्याने या भागांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते.
पेठ (ता. आंबेगाव) परिसरात व सातगाव पठार भागात अनेक ठिकाणी आज (दि. 19) दुपारी मुसळधार पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे करोनाबाबत महासर्व्हेक्षणासाठी आलेले कर्मचारी, शेतात गेलेल्या शेतकरी व मजूर यांची तारांबळ उडाली. या परिसरात असलेल्या बटाटा शेतात तर चक्क गुढगाभर पाणी वाहत होते. मागील आठवड्यातही असाच जोरदार पाऊस झाला होता आणि त्यात आज झालेल्या पावसाने अनेकांच्या बटाटा अरणीच्या काठावर पाणी शिरल्याने बटाटा अरणी भिजल्या आहेत. या भागात सध्या बटाटा काढणी सुरू आहे. मात्र, पावसामुळे बटाटा काढणी थांबली. मुसळधार पावसाने गावाच्या बाजूचे पाणी काढून देण्याचे चर पाण्याने पूर्ण भरले आणि ते रस्त्यावर, शेतात शिरले.
सध्या या परिसरात करोनाबाबबत सर्व्हेक्षण सुरू आहे. मात्र, दिवसभरात नियोजित केलेल्या शेतकरी, मजूर व इतर कुटुंबांच्या सर्वेक्षण कामात या पावसाने व्यत्यय निर्माण झाला.