डॉ.बाबा आढाव : महाळुंगे पडवळ येथे हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत
मंचर- हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्वदेशी नाऱ्यानुसार स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन व तंत्रज्ञानातील वेगवेगळे बदल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतीला वेळेवर पाणी, वीज मिळाली पाहिजे. सरकारने शेतमालाला योग्य हमीभाव देणे गरजेचे असल्याचे मत थोर समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी (दि. 12) व्यक्त केले. महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या प्राणज्योतीचे स्वागत अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे-पाटील यांनी केले. ढोल-लेझीम-ताशा पथक तसेच एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदनेने स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, सरपंच अनिल सैद, उपसरपंच सुलोचना पडवळ, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुक्तादेवी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, डॉ. दत्ता चासकर, कॉंग्रेसचे राजू इनामदार, शिक्षक बाळासाहेब कानडे, मुकुंद बारवे, आदेश गाडे, गणेश आवटे, प्रशांत सैद, हुतात्मा बाबु गेनु पुस्तकाचे लेखक प्रा. वसंत भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक आत्माराम जगदाळे यांनी, प्रास्ताविक किसन सैद यांनी केले.