बाजार समिती प्रशासक देशमुख यांनी केले स्पष्ट
मार्केट यार्ड – शेतकऱ्यांना परवाना असल्याशिवाय बाजारात खरेदीसाठी माल आणता येत नाही, अशी अफवा पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चलबिचल निर्माण झाल्याने पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीसाठी शेतमाल आणण्यास शेतकऱ्यांना कोणत्याही परवानगीची किंवा ओळखपत्राची गरज नाही. केवळ खरेदीदारांकडे परवाना असणे आवश्यक आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डासह अन्य उपबाजारात गर्दी होऊ नये. सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी केवळ परवानाधारक खरेदीदाराला भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात प्रवेश दिला जात आहे. मुख्य बाजारात रात्री नऊपासून पहाटे पाचपर्यंत शेतीमालाची आवक होत आहे.
गर्दी टाळण्यासाठी परवाना आणि ओळखपत्र पाहून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. घरगुती अथवा किरकोळ खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बाजारात प्रवेश देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांत चलबिचल निर्माण झाली; परंतु खरेदीदांसाठी परवाना गरजेचा असून शेतकऱ्यांसाठी नसल्याचे बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बाजारात शेतीमाल विक्रीसाठी आणण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या परवान्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा. याबाबत कोणी अडवणूक केल्यास बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती