हेळगाव – एप्रिल महिना चालू झाला की मुलांना चाहूल लागते ती उन्हाळी सुट्टीची. सध्या सुट्ट्या लागल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे तर याउलट वाढता उन्हाळा, पाण्याची कमतरता, भीषण दुष्काळाच्या झळा यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शाळांना सुट्टी लागल्याने मुलांनी केव्हाच मामाचा गाव गाठला आहे. नेमके याच महिनाभरात विविध गावांच्या यात्रा व शुभकार्य असतात. यानिमित्ताने मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावी आलेले असतात. त्यामुळे मुलांच्या आनंदात आणखीनच भर पडत असते. सुट्टीमध्ये यात्रा, खेळणे, पोहणे, फिरणे यासारखे जीवनातील आनंद फक्त आणि फक्त मुलेच घेऊ शकतात. चालु वर्षी मुलांच्या बाबतीत सर्व बाबी जुळूनच आल्या आहेत.जवळपास सर्वच मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा आनंद त्यांना पुरेपूर घेता येणार आहे.
याउलट परिस्थिती ही शेतकऱ्यांची झाली आहे. दिवसेंदिवस वाढता उन्हाळा, पाण्याची कमतरता, राज्यातील विविध भागात निर्माण झालेली भीषण दुष्काळी स्थिती अशा परिस्थितीत करावे लागणार कष्ट आणि वातावरण उष्ण, ना रोजगार करायला मजूर मिळतात, ना पुरेसे पाणी आणि त्यातच भरीस भर म्हणून अवकाळी पाऊस याच कालावधीत असतो. पण यावर्षी म्हणावा तसा अवकाळी पाऊस अजूनही झालेला नाही. आता जवळजवळ सर्वच कारखाने बंद झाले असून यापुढील पीक घ्यायचे म्हटले तर पाणी पाहिजे. शेतीची मशागत करावी लागणार, सद्यस्थितीत हळद, आलं, टोमॅटो यासारखी विविध पिके घेण्याच्या दृष्टीने जमिनीची मशागत करावी लागत असते. त्यात जर गावची यात्रा असेल किंवा घरात शुभकार्य असेल तर आणखीनच वाईट अवस्था होत आहे. या कार्यामुळे अनेक कामे आहेत पण ती परिस्थितीमुळे वेळेवर करता येत नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे.