मुंबई: शेतकऱ्यांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यापुढे शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून एकाच अर्जावर कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागणार नाही.
शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ या पोर्टलवर अर्ज भरावा लागणार आहे. विविध अपडेट्स शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे दिले जातील. शिवाय ‘महाडीबीटी’ पोर्टल आणि “महाभूलेख” पोर्टलचे जोडणी करणार असून अर्जासोबत स्वतंत्र सात बारा देण्याची गरज पडणार नाही.
अर्ज छाननी, निवड, लाभार्थ्याला पात्र-अपात्र ठरवणं, पूर्वसंमती, मंजुरी आदेश, अनुदानाचा लाभ देणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन प्रणाली मार्फत केली जाईल. तसेच एखाद्या योजनेसाठी शेतकरी अपात्र असल्यास तो इतर योजनेसाठी पात्र आहे का व पात्र असल्यास त्याचा लाभ देण्याचे काम ही प्रणाली करणार आहे. शासनाकडे आशेने पाहत असलेल्या शेतकऱ्यांना पुनश्च दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे.