वडगाव मावळ – राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन 2017,18 आणि 19 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने पवन मावळातील महिला शेतकरी प्राजक्ता गिरिधारी काळे यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांना रोख 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. तर वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्काराने मावळातील चांदखेड येथील नितीन चंद्रकांत गायकवाड (सन 2017), येळसे येथील नितीन बबन ठाकर (सन 2018), तसेच येळसे येथील मंगल मारुती दळवी (2019) या तीन शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना प्रत्येकी 11 हजार रुपये देण्यात आले आहेत.
हे सर्व पुरस्कार 2027 पासून रखडले होते. त्यानंतर करोना प्रादूर्भावामुळे आणखी दोन वर्षे हा पुरस्कार लांबणीवर पडला होता. नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.