साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
रांजणी – पुणे जिल्ह्यातील काही ठरावीक साखर कारखाने वगळले तर बहुतांशी साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम मार्चअखेर संपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी आणि सरकारी मिळून 21 साखर कारखान्यांपैकी बहुतांशी साखर कारखाने मार्चअखेर बंद होतील; परंतु असे असले तरी कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीनुसार अद्यापही ऊसबिले दिलेली नाहीत, त्यामुळे शेतकरी ऊस बिलाच्या प्रतीक्षेतच आहेत.
जिल्ह्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, घोडगंगा असे ठरावीक सहकारी साखर कारखाने एप्रिल महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. कारण या कारखान्यांच्या परिसरात अद्यापही ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याने उसाची कमतरता भासणार नाही; परंतु जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचे चित्र पाहता अनेक कारखाने मार्च महिन्यातच बंद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जे साखर कारखाने बंद होण्याच्या अवस्थेत आहे, अशा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना एफआरपीनुसार अद्यापही उसाची बिले अदा केलेली नाहीत, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे जीवन ऊस पिकावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांना ऊस बिलाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्यात ऊसदराचे तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखान्यांनी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर सह्या करून घेतल्या जात असल्याचेही समजते.
काही साखर कारखान्यांनी एक बिल देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु आजअखेर बिले देण्यासाठी बहुतांशी साखर कारखान्यांनी ठोस पावले उचलली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याच्या गाळपासाठी गेला आहे. अशा शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अशा परिस्थितीत ऊस बिले कधी मिळणार या विवंचनेत ऊस उत्पादक शेतकरी आहे.
कारखान्यांचे धुराडे विझण्याच्या मार्गावर आले असता अजूनही शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम हाती पडली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संसाराची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
“भीमाशंकर’चे व्यवस्थापन वचनपूर्तीच्या मार्गावर
जिल्ह्यातील बहुचर्चित आणि चांगले व्यवस्थापन असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे बाळासाहेब बेंडे यांनी काही दिवसापूर्वीच स्वीकारली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना उस बिलाची प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे सातत्याने कारखान्याच्या कामासंदर्भात मार्गदर्शन असल्याने भीमाशंकर कारखान्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, म्हणून कारखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या हितावह निर्णय घेण्यासाठी कायमच तत्पर असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
खासगी कारखान्यांचे दर जाहीर नाहीत
जिल्ह्यात चार खासगी आणि 13 सहकारी साखर कारखाने आहेत. साखर गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर करून साखर कारखाने सुरू केले जात होते. वास्तविक खासगीत चालविले जात असलेल्या साखर कारखान्यांनी जाहीरपणे दराची घोषणा केली आहे. मात्र, इतर कोणत्याही कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करताच गाळप सुरू केली आहे.