अंबाला, (हरियाणा) – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीला जात असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांना आज हरियाणा पोलिसांनी अडवले. शेकडो ट्रॅक्टर आणि ट्रकमधून हे शेतकरी दिल्लीच्या मार्गावर असताना त्यांना अडवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी दिल्लीपासून 200 किलोमीटर अंतरावरील शंभू इथल्या पंजाब-हरियाणा सीमेवर अडथळे उभे केले होते.
पोलिसांनी उभे केलेले अडथळे ओलांडून शेतकऱ्यांच्या जमावाने पंजाबच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी काही बॅरिकेड नदीमध्ये फेकून दिले. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे घग्गर नदीवरील पूलावर शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्रीला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावून सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.
शेतकऱ्यांनी परत जावे, यासाठी हरियाणा पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून आवाहनही केले. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अश्रुधुरामुळे पूलावरून मागे सरकलेले शेतकरी तेथून निघून जायला तयार नव्हते. ही धुमश्चक्री दीर्घकाळापर्यंत सुरू होती. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर केल्याबद्दल पंजाबच्या शेतकऱ्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.
पंजबमधून हरियाणामार्गे दिल्लील जाणारे रस्ते हरियाणा सरकारने पूर्ण बंद केले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर अडथळे उभे केले गेले आहेत. याआधी बुधवारी अंबाला येथील मोहरा गावाजवळ हरियाणाच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या जमावाने बॅरिकेड्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी पाण्याचा मारा केला होता.
शेतकऱ्यांच्या एका छोट्या गटाला अंबाला-कुरुक्षेत्र सीमेवरील तियोरा-तियोरी गावापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. तेथेही पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. हरियाणामध्ये ठिकठिकाणी जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्येही 26 आणि 27 नोव्हेंबरला कोणत्याही शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
लालरू, शंभू, पटियाला-पेहोवा, पात्राण-खानौरी, मूनक-तोहाना, रतिया-फतेहाबाद आणि तलवंडी-सिरसा आदी मार्गांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या 30 संघटनांचे कार्यकर्ते दिल्लीच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे पंजाब-हरियाणा सीमेवर ठिकठिकाणी तणाव निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या निषेध मोर्चात सुमारे 25,000 महिला भाग घेतील आणि त्यासाठी 4 हजार ट्रॅक्टर ट्रॉलींची व्यवस्था केली गेली आहे असे भारतीय किसान युनियन (एकता-उगारहन) सरचिटणीस सुखदेवसिंग कोक्रीकलान म्हणाले. या आंदोलनासाठी 2 लाख शेतकरी येण्याची अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.