नवी दिल्ली – लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा निषेध म्हणून संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या “रेल रोको’मुळे उत्र रेल्वेच्या 150 ठिकाणच्या रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. तर धावणाऱ्या 60 रेल्वेच्या वाहतुकीत खंड पडला, असे रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थान आणि हरियाणातील उतर-पश्चिम रेल्वे विभागाच्या वाहतुकीवर परिणाम झाला. एकूण 18 रेल्वे रद्द करण्यात आल्या. 10 रेल्वे अंशतः रद्द कराव्या लागल्या तर एका रेल्वेचा मार्ग आंदोलनामुळे बदलावा लागला. चंदिगड-फिरोझपूर एक्सप्रेससकाळी 7 वाजता लुधियानातून निघणार होती. मात्र आंदोलनामुळे ही रेल्वे मार्गस्थ होऊ शकली नाही.
साहनेवाल आणि राजपुरा येथे आंदोलकांनी रेल्वेमार्ग अडवून ठेवल्यामुळे नवी दिल्ली-शताब्दी एक्सप्रेस शंभू स्थानकातच थांबवावी लागली. या व्यतिरिक्त 25 पॅसेंजर आणि कमी अंतराच्या अन्य रेल्वे रद्द कराव्या लागल्या, असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
राजस्थानमध्ये हनुमानगढ जिल्ह्यातल्या रेल्वे मार्गांवर आणि जयपूर जंक्शन स्टेशनवर शेकरी संघटनांनी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भिवानी-रेवाडी, सिरसा-रेवाडी, लोहारू-हिसार, सुरतगड-भटिंडा, सिरसा-भटिंडा, हनुमानगढ-भटिंडा, रोहतक-भिवानी, रेवाडी-सादुलपूर, हिसार-भटिंडा, हनुमानगड-सादुलपूर आणि श्री गंगानगर-रेवाडी विभागातील रेल्वे वाहतुकीवर आंदोलनाचा परिणाम झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फिरोझपूर-हनुमानगढ, लुधियाना-हिसार. भटिंडा-श्रीगंगानगर, भटिंडा-लालनगर, फुटेरा- रेवाडी. रेवाडी-जोधपूर, रत्नागढ-चुरू आणि चुरू-बिकानेर या मार्गांवरच्या विशेष रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या. तर 10 रेल्वेगाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.
अहमदाबाद-श्री माता वैष्णवदेवी कटरा या विशेष रेल्वेचा मार्ग बदलावा लागला. तर अहमदाबादेतून शनिवारी निघालेल्या रेल्वे रेवाडी-दिल्ली- पठाणकोट मार्गे कटरा येथे जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, तसेच लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना अटक करण्यात यावी या मागण्यांसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हे रेल रोको आंदोलन केले गेले.