तालुक्यातील बाधित पिकांची केली पाहणी
संगमनेर (प्रतिनिधी) – राज्यात अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरवर शेतातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शेतकऱ्यांनी विमा भरलेला असो किंवा नसो, प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मदत करणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, सेंद्रिय कांदा, मका, डाळिंब, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी आयुक्त दिवसे आले होते. यावेळी त्यांनी पठार भागातील खंदरमाळवाडी, बोरबन, बोटा येथील पिकांची बंदावर जाऊन पाहणी केली.
दरम्यान पाण्यात भिजलेली बाजरी, कांदा, ज्वारी, मका पाहणी करून दिवसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. तसेच तत्काळ आर्थिक मदत, विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे. यावेळी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पंचनाम्यात दिसून आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषी आयुक्त दिवसे म्हणाले, पावसाचे काही खरे नाही. कधीही पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकाचाही विमा काढणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे चांगले पैसे मिळतात. यावेळी डाळिंब बागांचीही पाहणी केली. शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पिकांचे पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत पुणे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, उपसरपंच प्रमोद लेंडे, किशोर डोके, दिलीप साळगट, मंडळ कृषी अधिकारी नामदेव धांडे, महसूलचे मंडल अधिकारी किसन लोहारे, सुरेश चवाळे, विलास गुंजाळ, दिलीप वाकचौरे, लक्ष्मण भोकनळ, हिरालाल सुर्वे, प्रदीप मंडलिक, तलाठी केशव शिरोळे, ग्रामसेवक भारत देशमुख आदी उपस्थित होते.