सातारा -जिल्ह्यातील काही साखर कारखाने वगळता बहुतेक कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले दिलेली नाहीत. या कारखान्यांनी सुमारे 400 कोटींची ऊस बिले आणि त्यावरील व्याज देणे कायद्याने बंधनकारक आहे. ते न दिल्यास आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व नियम पाळून आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील बहुतेक कारखान्यांनी ऊस बिले न दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाले आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देत नाहीत. आता देशावर करोनाचे महाभयंकर संकट आले आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री आणि दोन्ही सरकारे, प्रशासन सक्षमपणे या संकटाविरोधात लढत आहेत. शेतकरी हा देशातील मुख्य घटक आहे.
आज संपूर्ण देशाला दोन वर्षे पुरेल एवढा धान्यसाठा फक्त शेतकऱ्यांमुळे उपलब्ध आहे, तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्याची सगळीकडे लूट होत आहे. करोनामुळे देशात पुढे किती दिवस लॉकडाऊन करावे लागेल किंवा हे संकट कधी जाईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने मिळवून द्यावेत.
खरीप हंगाम काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पूर्वमशागत, जुन्या उधाऱ्या चुकविणे, पुढील हंगामासाठी खते व बी-बियाणांची खरेदी, कर्ज परतफेड, कुटुंबीयांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू यासाठी त्यांचे हक्काचे पैसे शेतकऱ्यांना तातडीने मिळाले पाहिजेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे, खते बांधावर उपलब्ध करून द्यावीत.