निमोणे – शिरूर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पशूधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. निमोणे, गुनाट, चिंचणी, करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी, मोटेवाडी या परिसरात पाणी नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
यंदा संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात; परंतु पाणीच उपलब्ध नसल्याने चारा आणायचा कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पशूधन धोक्यात आले असून शेतकरी चारा व पाण्याच्या अभावी नाईलाजाने स्वस्तात पशूधन विकत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला असून जून महिना सुरू होऊनही पाऊस न पडल्याने बळीराजाच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाण्याअभावी अनेक ठिकाणी ऊस जळून जात असून हाच ऊस शेतकरी चारा म्हणून जनावरांना घालत आहेत. त्यामुळे सध्या शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी मका, कडवळ तसेच ऊस विकत घेऊन पशूधन जगविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.