श्रीरामपूर – मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले, त्यानुसार श्रीरामपूर तालुका वगळता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे. तसेच मार्च- एप्रिलमधील गारपिटीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहे. तथापि श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मात्र या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत.
त्यामुळे आ.लहू कानडे यांचे बंधू अशोक कानडे यांच्यासह कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेऊन त्याठिकाणी आंदोलन केले. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत तहसील कार्यालय खाली करणार नाही, असा निर्धार करत याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. आम्ही बसून राहणार, ही भूमिका कानडे यांनी घेताच तहसीलदारसह तहसील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यथांचा पाढाच वाचला. अशोक कानडे यांनी खरिपातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई 15 कोटी तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची नुकसान भरपाई 15 कोटी असे शेतकऱ्यांचे 30 कोटी रुपये व मार्च-एप्रिलमधील गारपीट झाल्यामुळे झालेली नुकसान भरपाई आपण श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना केव्हा द्याल ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत याची लेखी आम्हाला त्वरित द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतल्यामुळे तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आयुक्त कार्यालय यांचेशी संपर्क करून लेखी पत्र देण्याचे कबूल केले.
15 दिवसांच्या आतमध्ये प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून पैसे वर्ग होतील, याची लेखी हमी दिली. 15 दिवस वाट पाहू व नंतर पुढचे पाऊल उचलू, असे कानडे यांनी सांगितले. त्यामुळे मोर्चातील शेतकरी शांत झाले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर कोळसे पाटील यांनी सर्वांचे आभार मानून “शेतकऱ्यांची अवस्था’ या चारोळ्यानी आंदोलनाचे विसर्जन केले.