लॉकडाऊनमध्येही भाजी विक्रेत्यांना सुटेना जास्तीच्या पैशांची हाव
पुणे – करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे भाव तेजीत आहेत. मात्र, हा भाजीपाला पीकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे “शेतकरी उपाशी आणि किरकोळ विक्रेते तुपाशी’ अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमध्ये भाजी विक्रेत्यांची पैसे कमावण्याची हाव काही सुटत नसल्याचे चित्र आहे.
भाजीपाल्यांच्या चढ्यादराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. प्रशासनाकडून अद्याप अशा विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. शेतकरी कमी भाव मिळत असल्यामुळे, तर ग्राहक भाव वाढीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मधल्यामध्ये हा पैसा विक्रेत्यांच्या खिशात जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांकडून 20-30 रुपये किलोने घेतलेला भाजीपाला ग्राहकांना मात्र 50 ते 100 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे भाजीपाल्यासाठी मोजत असलेला चढ्या भावाचे पैसे शेतकऱ्यांच्या नाही तर विक्रेत्यांच्या खिशात जात आहेत.
देशावर आलेल्या संकटात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. मात्र, भाजीविक्रेत्यांना मात्र ही परिस्थिती आता संधी वाटत आहे. त्यातूनच ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा मोह सुटत नाही. अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.