नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुमारे चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान, आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या म्हणण्यानुसार हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असणार आहे. अनेक पक्षांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
“दिल्लीतल्या सीमेवरील शेतकरी संघर्षाला आज 26 मार्च रोजी 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी सरकारविरोधात भारत बंद होईल.” असे निवेदनात सांगण्यात आले आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावरून विविध शेतकरी संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, बार संघटना, राजकीय पक्ष आणि राज्य सरकार यांच्या प्रतिनिधींनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.
किसान मोर्चाने सांगितले की, पूर्ण भारत बंद अंतर्गत सर्व दुकाने, मॉल, बाजारपेठा आणि संस्था बंद ठेवल्या जातील. सर्व छोटे-मोठे रस्ते आणि गाड्या रोखण्यात येतील. रुग्णवाहिका व इतर आवश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील. दिल्लीतही भारत बंदचा परिणाम होईल. शेतकरी नेते दर्शन पालसिंग म्हणाले की ज्या दिल्लीत धरणे आंदोलन सुरू आहे अशा सीमा आधीच बंद आहेत. यावेळी पर्यायी मार्ग उघडण्यात आले. उद्याच्या भारत बंददरम्यान हे पर्यायी मार्गही बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वांनी शांत राहून या बंदला यशस्वी करण्याचे आवाहन किसान मोर्चाने केले आहे. कोणत्याही प्रकारच्या बेकायदा वादात न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या भारत बंदला काँग्रेस, सीपीआयएमसह अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, बहिऱ्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी निर्णायक संघर्ष आवश्यक आहे.सध्याची शेतकरी चळवळ याच दुव्याचा भाग आहे. तीनशे शेतकरी बांधव शहीद होऊनही झोपलेल्या मोदी सरकारला उठवण्याची वेळ आली आहे. 26 मार्चला प्रस्तावित शांततापूर्ण आणि गांधीवादी भारत बंदला आमचा पाठिंबा आहे.