मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येक जिल्ह्यातून तीन शेतकऱ्यांना सहकुटुंब निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेल्यानंतर शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये असे पांडुरंगाला साकडे घातले होते. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. सध्या सगळेजण दिवाळी साजरी करत आहेत. राज्यभर आनंदात दिवाळी साजरी होत आहे. शेतकऱ्यांनी कितीही संकटं आली तरी खचून जावू नये. शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. आम्ही कायमच शेतकरीराजा सोबत आहोत, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी गडचिरोली येथे पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच नागपूर येथे बोलताना शिंदेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.