नागठाणे – केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येथील महसूल विभागाच्या काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे नऊ महिन्यांचा दीर्घ कालावधी उलटल्यानंतरही तालुक्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे.
दुसरीकडे अधिकारी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना हताश करत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात बघावयास मिळत आहे. एकंदरीतच महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे.
लोकसभग निवडणुकीपूर्वी अत्यंत घाईगडबडीत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना कार्यान्वित केली. ‘
सुरुवातीला अल्पभूधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता. मात्र नंतरच्या काही महिन्यातच केंद्र सरकारने ही योजना सरसकट शेतकऱ्यांसाठी लागू केली. या योजनेत शेतकऱ्यांना 12 महिन्यामध्ये तीन टप्प्यात सहा हजार रूपये देण्याचे ठरविले. मात्र तहसील कार्यालयातील काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही कोणतीच रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधितांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आहे.
नोडल अधिकारी यांनी व तलाठ्यांने अनेक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करताना कागदपत्रांचा घोळ करीत चुकीचे आधार क्रमांक, खाते क्रमांक अपलोड केले. त्यामुळे शेतकरी बॅंकेत पैसे जमा न झाल्याची चौकशी करण्यास गेले असता, तलाठ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. काही शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला, तर काही शेतकऱ्यांना तर अजुनही पहिलाच हप्ता मिळाला नाही. त्यात आधीच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांनी यावर्षी कशीबशी पिके जगविली. आता पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. त्यातच सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.