कराड – सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य ऍड. उदयसिंह पाटील यांनी केले.
जिंती, ता. कराड येथे सातारा जिल्हा परिषद, कराड पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. फरिदा इनामदार होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य काशिनाथ कारंडे, शरद पोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे, पशुसंवर्धन विभाग कराडचे सहाय्यक आयुक्त दिनकर बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, जिंती गावात गत वर्षापासून चाऱ्यातून होणाऱ्या विषबाधेमुळे मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे दाखवण्याच्या घटना घडल्या होत्या. येथील पशुपालकांच्या पाठीशी पशुसंवर्धन विभाग असून तातडीने उपाययोजना, मार्गदर्शन या विभागामार्फत सुरू आहे. शेतकऱ्यांनी चाऱ्यातून होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
संजय शिंदे म्हणाले, दुभती जनावरे दगावण्याचे सत्र थांबवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. यावेळी शिबिरामध्ये सचिन शिंदे, डॉ. प्रसाद भुतकर, डॉ. संतोष स्वामी, डॉ. विनोद पाटील, डॉ. दीपक कापरे यांनी लाळ खुरकत, विषबाधा, रेबीज, शेळी, मेंढी प्रकल्प यासह शासकीय योजना बाबत माहिती दिली. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी केले. तर आभार पशुधन विकास अधिकारी विनोद पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास उपसरपंच अशोकराव पाटील, संतोष पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी अशोकराव पाटील, सेवा सोसायटीचे सदस्य आत्माराम पाटील, दिलीप पाटील, संभाजी गुजले, मगनराव पाटील, विनायक पाटील, राजाराम चव्हाण, सिताराम पाटील, अशोक खोचरे, शिवाजी पाटील, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.