जालना : भोकरदन तालुक्यातील देहेड या गावात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काशिनाथ देऊबा बावस्कर (45) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
सोमवार दुपारी चार वाजता ते शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते. विहिरीवर असलेल्या स्टार्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी बावस्कर गेले असता त्यांना विजेचा झटका बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बराच वेळ झाल्यानंतर देखील पती घरी परतले नाहीत म्हणून पत्नीने शेजारी राहणाऱ्यांना सांगितले. दरम्यान बावस्कर यांना फोन लावला असता ते उचलत नसल्याने शेजाऱ्यांनी शेताकडे धाव घेतली.
तेव्हा त्यांना बावस्कर यांचा विहिरीजवळ मृतदेह आढळून आला. बावस्कर यांचा होळी सणाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.