संगमनेर – संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात कांदा सोडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरवत असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसत आहे.
यंदा उशिरा पाऊस झाला. अनेकांनी पाऊस नसल्याने सुरवातीला पेरण्याच केल्या नव्हत्या. नंतर पाऊस पडेल, या आशेवर काहींनी कांदा पीक घेतले होते. पाऊस पडल्याने यंदा उत्पन्न चांगले होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे शेतात पंधरा ते वीस दिवस पाणी साचून राहिल्याने कांदा जमिनीतच सडून गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला.
दरवर्षी प्रत्येक हंगामात नांदूर खंदरमाळ परिसरातून जवळपास तीनशे ते चारशे हेक्टर कांदा पीक घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून सलग दुष्काळ पडल्याने उत्पन्न घटत चालले आहे. शेती करणे अवघड झाले आहे. त्यात ऑक्टोबर महिन्यात सलगपणे झालेल्या जोरदार पावसाने पीक शेतातच सडून गेले. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसला आहे. उभ्या पिकात नांगर घालण्याशिवाय पर्याय नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
या वर्षी कांद्यास चांगला दर मिळत असूनही कांदा शेतातच सडल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. खरीप हंगामात पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी कशी करायची? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. तर उधारी, उसनवारीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतात कांदा सडल्याने परिसरातील शंकर कारंजेकर या शेतकऱ्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवला आहे.