सात-बारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही : राज्य शासनाचा उपक्रम
या सुविधेमुळे होणारे फायदे
-शेतकरीनिहाय पीकांच्या नोंदी घेतल्या तर निश्चित पीक लक्षात येईल.
-नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार
-हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत
पुणे – शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. शेतकरी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मोबाइल ऍपद्वारे फोटो काढून हा फोटो अपलोड करणार आहे. या मोबाइल ऍपमध्ये अक्षांक्ष व रेखांशची नोंद होणार असल्याने शेताचे स्थानही समजणार आहे. तलाठ्यांकडून या फोटो व स्थानाची पडताळणी होणार असून त्यानंतर शेतातील पिकांची नोंद संबधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर होणार आहे.
या प्रकल्पासाठी शासनाने टाट्रा ट्रस्ट बरोबर सामंजस्य करार केला आहे. राज्यातील सहा तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबविला जात असून आतापर्यंत 794 गावांमधील 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांनी मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंद केली आहे. बारामती तालुक्यातील 117 गावांमधील 33 हजार 554 शेतकऱ्यांनी स्वत: मोबाइल ऍपद्वारे पिकांची नोंद केली आहे.
ग्रामीण भागात गावपातळीवर जमिनीचे महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना नं.7 हा “अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नं 12 हा “पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असून गाव भेटीनंतर सदर नोंदी चुकीच्या आढळल्यास त्या दुरुस्त करण्याबाबतचा अधिकार मंडळ निरीक्षक किंवा त्याहून वरिष्ठ असलेल्या अधिकारी यांना आहे. तसेच गाव नमुना नंबर 12 मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी हे पीक पेरणी अहवालाच्या नोंदी घेतात.
गाव पातळीवरून पीकपेरणी अहवालाचा खरोखर व वास्तववादी माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे, याहेतूने पीक पेरणीबाबतची माहिती मोबाईल ऍपद्वारे सात बारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून एक मोबाइल ऍप विकसित केले आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या मोबाइल ऍपद्वारे पालघर जिल्ह्यातील करंजपाडा येथे प्रायोगिक तत्वावर या हा प्रकल्प राबविण्यात आला होता. यानंतर हा प्रकल्प निवडक तालुक्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. 6 तालुक्यांतील शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाइल ऍपद्वारे तलाठ्यांना कळवित आहे. त्यानंतर तलाठी 15 दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन स्थळ पाहणी करून पीक पाहणी करत आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी.