लखीमपूर खेरी – उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत शेतकऱ्यांनी तीन दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन शनिवारी समाप्त केले. आता 6 सप्टेंबरला पुढील रणनीती ठरवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची दिल्लीत बैठक होणार आहे. त्या बैठकीमुळे शेतकरी पुन्हा देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांना हटवण्याच्या आणि शेतमालाला किमान आधारभूत किंमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्याच्या तसेच इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरीत धरणे धरले. शेतकऱ्यांच्या उत्तरप्रदेशशी संबंधित मागण्यांवर विचार करण्याची ग्वाही देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर धरणे समाप्त झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारीच मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनास सज्ज राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. आता संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीची तारीख निश्चित झाल्याने शेतकरी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले होते. त्याचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चाने केले.