रत्नागिरी : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहारज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन राज्यपाल महोदयांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादाजी भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आदिंची व्यासपीठावर उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हयाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्हयाची ओळख हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगास आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठया प्रमाणावर आहे तर विद्यापीठात शेती विषयक विज्ञान व संशोधन आहे. याची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात व्हायला हवा असेही राज्यपाल महोदयांनी सांगितले.
जिल्हयात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकाची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले.