नवी दिल्ली – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा आणि अटकेच्या मागणीसाठी शेतकरी उद्या (सोमवार) देशव्यापी रेल रोको आंदोलन करणार आहेत. आंदोलनावेळी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत देशभरातील रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणावरून आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या मोर्चाने देशव्यापी रेल रोकोची हाक दिली आहे. शांततेत रेल रोको करताना रेल्वेचे कुठले नुकसान न करण्याचे आवाहन मोर्चाने देशभरातील शेतकरी संघटनांना केले आहे.
काही दिवसांपूर्वी लखीमपूर खेरीत एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ते वाहन मिश्रापुत्र आशिषचे असल्याचे समोर आले. त्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर आशिषला अटक करण्यात आली. मात्र, संयुक्त किसान मोर्चाने आशिषचे वडील मिश्रा यांच्याही अटकेची आणि राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणात योग्य न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत नेण्याचा इशारा मोर्चाने दिला आहे.