बठिंडा – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात लढत असलेल्या शेतकरी आंदोलनातील 25 व्या दिवसांपर्यंत 20 शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती आहे.
आज बठिंडामध्ये 22 वर्षीय शेतकरी तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव गुरलाभ सिंग असे आहे. विशेष म्हणजे गुरलाभ दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनावरून आपल्या घरी परतला होता.
बठिंडातील रामपुरा फूलच्या दयालपुरामध्ये राहणारा गुरलाभ 18 डिसेंबरलाच आंदोलनावरून परत आला होता. त्याने आज विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली. गुरलाभ अल्पभूधारक शेतकरी आहे. त्याच्यावर सहा लाखांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या 25 दिवसांपासून मोदी सरकारविरोधात हे शेतकरी कडकडत्या, बोचऱ्या थंडीत कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले आहेत. तरी मोदी सरकारला अजून जाग येत नाहीये. केंद्र सरकार फक्त चर्चेच्या फेऱ्या झाडत असून त्यातून काहीही निष्पन्न होत नाहीये, असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांची आत्महत्या हा मुद्दा मोदी सरकारला नरजेआड करता येण्यासारखी नाही. सरकारने यावर त्वरित काही तरी मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.