नवी दिल्ली – ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते यांच्या कायदेशीर अडचणी वाढणार आहेत. हिंसक घटना, सार्वजनिक संपत्तीची हानी, पोलिसांवरील हल्ला तसेच लाल किल्ल्यावरील कृत्यासाठी जबाबदार धरले जाणार याची जाणीव झाल्यामुळे संसदेवर मोर्चा घेऊ जाण्याची धमकीवजा भाषा करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आता माघार घेतली आहे. संसदेवर 1 फेब्रुवारी रोजी नेणार असलेला मोर्चा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली.
दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांचे नेते, आंदोलनासाठी चिथावणी देणारे अशा सर्वांविरोधात एफआयआर नोंदवल्या आहेत. दिल्लीत रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेल्या कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून कायदा हाती घेणाऱ्यांविरोधात कारवाईची तयारी सुरू आहे. चिथावणी देणारी भाषणे करणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या भाषणांचे व्हिडीओ पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. हे व्हिडीओ दाखवून शेतकरी आंदोलनाचा खरा चेहरा पोलिसांनी देशासमोर आणण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे बोलले जात असताना शेतकऱ्यांनी प्रथमच काहीशी सबुरीची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियनच्या भानू गटाने आंदोलनातून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे. या संघटनांचे सदस्य आणि त्यांचे समर्थक यांनी आपापले सामान आवरुन, तंबू पाडून घरी परतण्यास सुरुवात केली असून अचानक दोन संघटनांनी माघार घेतल्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी जमलेल्या इतर मंडळींमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पोलीस कारवाई झाली तर अडचणीत सापडू हे लक्षात आल्यामुळे आंदोलनाच्या समर्थनासाठी आलेल्या अनेकांनी आपले सामान आवरुन घराचा रस्ता धरला आहे. भारतीय किसान युनियन (लोकशक्ती) पुढील तासांत आंदोलनात राहायचे की बाहेर पडायचे याचा निर्णय घेणार आहे.
ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलीस परवानगी घेताना ज्या अटींचे पालन करू असे शेतकरी नेत्यांनी लिहून दिले होते त्या अटींचे उल्लंघन झाले. या प्रकरणात पोलिसांनी शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल, जोगिंदर सिंह उग्रा, बीकेयूचे राकेश टिकैत तसेच त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवल्या आहेत. पोलीस कारवाईची शक्यता लक्षात येताच शेतकरी नेत्यांनी हिंसेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. एकप्रकारे आंदोलनात फूट पडल्याचेच हे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
शेतकऱ्यांना चिथावणी देणारी शेकडो सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आली आहेत. आतापर्यंत 19 जणांना अटक केली आहे. तब्बल 50 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सर्व दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले.
अनेकांनी माघार घेतल्यामुळे दिल्लीला शेजारी राज्यांशी जोडणारे रस्ते मोकळे होत आहेत. या निर्णयामुळे दिल्लीकडून पश्चिम उत्तर प्रदेशमधील नोएडाला जोडणारा महामार्ग मोकळा होत आहे. चिल्ला सीमेवरील रस्ता वाहतुकीसाठी खुला होत आहे. तब्बल 58 दिवस हा रस्ता शेतकऱ्यांनी अडवून धरला होता. आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे जाहीर करताना राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही. एम. सिंह यांनी हिंसेसाठी राकेश टिकैत कारणीभूत असल्याचा आरोप केला.
आंदोलक शेतकऱ्यांना विरोध
हरियाणातील रेवाडी जवळ पंधरा गावांची महापंचायत झाली. यात आंदोलनासाठी रस्ता अडवून बसलेल्या शेतकरी संघटनांना विरोध करण्याचा निर्णय झाला. यानंतर गावकऱ्यांनी शेतकरी संघटनांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रस्ता मोकळा करा नाही तर तुम्हाला हाकलून देऊ असा इशारा स्थानिकांनी दिला. पुढील चोवीस तासांत रस्ता मोकळा केला नाही तर जबरदस्तीने सामान उचलू आणि हाकलून देऊ असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी शेतकरी संघटनांना दिला.
संसदेवरील मोर्चा रद्द पण उपोषण करणार
शेतकरी नेता दर्शन पाल यांनी 1 फेब्रुवारीचा संसदेवरील मोर्चा रद्द झाला तरी उपोषण करणार असल्याचे सांगितले. त्यांनी 30 जानेवारी रोजी समर्थकांना लाक्षणिक उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. स्वराज इंडियाच्या योगेंद्र यादव यांनी जे घडले ते दुर्दैवी होते, असे म्हटले आहे, तर शेतकऱ्यांची बदनामी होत आहे, असे शेतकरी नेता हन्नान मोल्लाह म्हणाले.