सहारणपूरपासून 2 हजार शेतकरी मोर्च्यात सहभागी
नोएडा / नवी दिल्ली – ऊसाची थकबाकी, कर्जमाफी आणि स्वस्त वीजेच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशमधील शेकडो शेतकऱ्यांनी नवी दिल्लीत आज मोठा मोर्चा काढला. मात्र किसान घाटाकडे जाणारा हा मोर्चा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर थांबविण्यात आला. मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना कृषी भवन येथे अधिकाऱ्यांना भेटायला परवानगी देण्यात आली.
भारतीय किसान संघटनेच्या बॅनरखाली आंदोलन करणारे शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र-9 आणि राष्ट्रीय महामार्ग क्र-24 वर मोर्चा अडवण्यासाठी बॅरिकेड्स लावली आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रहदारीला अन्य मार्गाने वळवले.
शेतकऱ्यांनी 11 सप्टेंबर रोजी सहारनपूर येथून मोर्चाला सुरवात केली होती.
शुक्रवारी नोएडा येथे पोहचल्यावर त्यांनी सरकारी प्रतिनिधींशी चर्चा केली पण प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले होते. त्यांना माजी पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचे स्मारक असलेल्या किसन घाटावर जायचे होते.
मात्र रॅलीमुळे गाझिपूर बॉर्डर यूपी गेट ते निझामुद्दीनपर्यंत एनएच-9, एनएच -24 मधील दोन्ही बाजूंवर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, असे दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितले. दिल्ली-यूपी सीमेवर निदर्शकांना रोखण्यात आले होते. परंतु रहदारीची स्थिती सामान्य होती, असे पूर्व विभागाचे पोलिस सहआयुक्त आलोक कुमार यांनी सांगितले.
सिंचनासाठी स्वस्त वीज आणि कर्जमाफी यासह 15 मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय शेतकरी व मजुरांना वयाच्या 60 व्या नंतर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन मिळणे आवश्यक आहे, पश्चिम उत्तर प्रदेशात उच्च न्यायालय आणि एम्स असले पाहिजेत, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मोर्च्यात वेगवेगळ्या राज्यातून आलेले सुमारे दोन हजार शेतकरी आहेत जे आहेत.