मुंबई – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कॉमरेड अशोक ढवळे उपस्थित होते.
शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील भूमिकेवर कडाडून टीका केली. तर अशोक ढवळे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी, अशी खोचक टीका ढवळे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने संपूर्ण देश विकायला काढला आहे. रेल्वे, शिक्षण, हॉस्पिटल, संस्था एअरपोर्ट विकले. आता शेती आणि शेत जमीनी विकायला काढल्या आहेत.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनाची कधी चौकशी केली का ? पंजाबचा शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा शेतकरी आहे का ? केंद्र सरकारने कोणालाही विश्वास न घेता कायदे पास केल्याचे पवार यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदींनी कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे होती. पण ती झाली नाही. शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही कृषी कायदे उद्धवस्त झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.