नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाची धग आणखी वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंद पाळला. त्या बंदमुळे प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणातील रेल्वे आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भारत बंद पुकारण्यात आला. त्याचा परिणाम पंजाब आणि हरियाणा ही राज्ये वगळता देशाच्या इतर भागांत फारसा जाणवला नाही. विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या राज्यांना बंदमधून वगळण्यात आल्याचे शेतकरी संघटनांनी आधीच जाहीर केले होते.
दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्यांमध्ये पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांत शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी रेल आणि रास्ता रोको केले. दोन्ही राज्यांत बऱ्याच ठिकाणी दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. पंजाब आणि हरियाणाचा अपवाद वगळता देशाच्या इतर भागांत रेल्वेसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.