तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील तळेगाव स्टेशन परिसरातील भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांना फळ व भाजीपाला विक्रीसाठी भाजी मार्केटमधील महिला व्यापारी विरोध करीत असून, शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर फेकला आहे. बाजारामधील महिला व्यापारी व शेतकरी वाद कायमच निर्माण होत आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र भाजी मार्केटची व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी स्वतःच्या शेतात फळ व भाजीपाला पिकवतात. त्यामुळे “फ्रेश’ भाजीपाला व फळ विक्रीसाठी तळेगाव दाभाडे भाजी मार्केटमध्ये आणतात. त्या शेतकऱ्यांना ग्राहकांची पसंती अधिक मिळत असते. तर दुसरीकडे महिला व्यापारी तुमच्या फळ व भाजीपाला विक्रीमुळे आमचा माल विकला जात नाही. असा वाद घालतात. भाजीमार्केटमधील महिला व्यापारी पुरुष शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर फेकून देतात. पुन्हा बाजारात आलात, तर मारहाण केली जाईल, असा दम भरत असल्याचे प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
पुरुष शेतकरी असल्यावर महिला व्यापारी धक्काबुक्की करून शिवीगाळ करीत त्यांचा माल फेकून देतात. यामध्ये काहीजण त्या शेतकऱ्याला मारहाण करताना त्या शेतकऱ्याचा शेतीमाल चोरत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या भांडणाची खबर दिली असता, पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले, पण महिला कर्मचारी नसल्याने पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. या भांडणामुळे ग्राहक व्यापारी व नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांना मध्यस्थी करीत हा वाद मिटवला.
आम्ही व्यापाऱ्याला शेती माल विकला, तर उत्पादन खर्च निघत नाही. आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. व्यापाऱ्यांपेक्षा कमी किंमतीत शेती माल विकतो. शेतकरी जगाला, तर शेतीमाल उत्पादन होईल.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतंत्र भाजी मार्केटसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी भगवान पगडे, भानुदास मराठे, पांडुरंग केदारी, सजाबाई दहातोंडे, ज्ञानेश्वर वारींगे, अलका केंजाळे, गेणू कोळेकर, राजू गाडे, दादू मेंगळे, भिकाजी चव्हाण, कौशल्या कराळे, शकुंतला शेवकरी, संदीप गाडे, योगेश ढोरे, कल्पना शिंदे, दिलीप हागवणे, बंडू कराळे, मधुकर खोंडगे, राजू दाभाडे, ज्ञानेश्वर घावटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
या वेळी किशोर आवारे म्हणाले की, नगरपरिषद हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी खास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र भाजी मार्केट उभारणी व्हावी. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या भाजी मार्केटमध्ये त्यांच्या शेतातील फळ व भाजीपाला विकता येईल.