कराड -गेल्या दोन वर्षांपासून करोना प्रादुर्भाव, कधी अतिवृष्टी, महापूर, वातावरणातील बदल आदी कारणाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळलाच नाही. दोन वर्षात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खरिप हंगामातील सोयाबीन या हुकमी उत्पादन मिळवून देणारी पीकावरच मदार होती. सोयाबीनला दर इतिहासात प्रथमच सोयाबीन दर मुहूर्तालाच 11 हजारापर्यंत गेले होते. शेतकऱ्यांची सध्या सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे.
सोयाबीन काढणीस सुरुवात झाल्याने दर निम्म्याने खाली उतरल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा आर्थिक संकट उभे राहिले आहे. जर सोयाबीन दर निम्म्याने कमी केले आहेत तर खाद्यतेलाचे दर निम्म्याने कमी का नाहीत असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
टोमॅटो, मिरची यासह भाजीपाला दरात घसरण झाल्याने सोयाबीनला तरी हमीभावाच्या दुप्पट दर मिळण्याची आशा होती. सोयाबीन दरात जर निम्म्याने कमी होतात तर खाद्यतेलाचे दर ही निम्म्याने कमी का केले जात नाहीत. शेतमालाचे भाव पाडले जातात तर खाद्यतेलाचे भाव का पडले नाहीत. असाही प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापूराने खरिप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, कडधान्य पिके, ऊस या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर सोयाबीनला शेंगा भरण्याच्यावेळी पावसाने दडी मारली होती.
गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. सोयाबीनचा उतारा घटल्याने शेतकऱ्यांना वाढलेल्या दरावरती आशा होत्या. मात्र दरातही घट झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतात सोयाबीनचे पीक डोलत असताना बाजारभाव आकाशाला भिडलेले होते. सोयाबीनला सोन्याच्या दराची झळाळी मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शेतातून सोयाबीन निघून बाजारपेठेत येण्यास सुरुवात होताच भावात झपाट्याने घसरण झाली आहे. सोयाबीनच्या दरात घट झाल्याने शेतकरी संतप्त झाले असून शासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास शेतकऱ्यांना आंदोलन हाती घ्यावे लागेल.
यागेश झांबरे-पाटील,(रयत क्रांती शेतकरी संघटना)