भामा आसखेड, चास कमान धरण कालव्यासाठी संपादित जमिनीवरील सात-बारावरील शिक्के काढण्याची मागणी
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील भामा आसखेड, चास कमान धरण कालव्यासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या सातबारावरील संपादनाचे शिक्के काढण्यात यावे, या मागणीसाठी 21 गावांतील शेतकरी (कुणबी) मराठा संघ यांच्या माध्यमातून सोमवारी (दि. 6) खेड तहसीलदार कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.
खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणप्रकल्पाच्या पुनर्वसन कामी अधिग्रहित केलेल्या 21 गावांतील शेतकऱ्यांच्या सातबारावरील कब्जेदार सदरी हक्कातील शिक्के तात्काळ काढण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या दि. 19 जून 2017 च्या बैठकीत झालेल्या 95 नियामक मंडळाच्या बैठकित भामा आसखेड प्रकल्पचे कालवे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या बैठकीत ठराव क्र 95/09 नुसार हे कालवे रद्द करण्याची शिफारस शासनास करण्यात आली होती, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या जमिनीवरील असलेले कब्जेदार सदरी आणि इतर हक्कातील शिक्के काढण्याचा निर्णय झाला होता; मात्र अद्यापपर्यंत भूसंपादन केलेल्या जमिनींवरील शिक्के काढण्यात आले नाहीत.
चास कमान धरणाच्या उजव्या कालव्यातून खरपुडी, वाकी बुद्रुक, काळूस या गावांना पाणी मिळणार होते; परंतु प्रत्यक्षात कलावा झाला नाही. कालव्याची शासनाने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या होत्या. 153 हेक्टर क्षेत्रावर संपादन करून शिक्के मारले होते, ते तात्काळ काढण्यात यावेत. शासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पुनर्वसन कमी घेतले; घेतलेल्या जमिनींचे पैसे घेण्यस भाग पडले अशा शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या-त्या शेतकऱ्यांना परत देऊन घेतलेले पैसे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा दाखवून सरकाने वसूल करावेत व पुनर्वसन कमी घेतलेल्या सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
धरणे आंदोलनात आप्पासाहेब कड, साहेबराव अरगडे, भारत अरगडे, एन. एन. मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, दगडू काळे, भगवान दौंडकर, नंदकुमार मुंगसे, परशुराम खैरे, नवनाथ गवते, संदीप गवते, शिवाजी बोरकर, रामचंद्र कड, शाम कड, तुकाराम कड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
मोबदला नाही, लाभही नाही…
भामा आसखेड प्रकल्पात गोणवडी, बोरदरा, चाकण, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलपिंपळ्गाव, कोयाळी, बहुळ, मरकळ, मोई, कुरुळी, रोहकल वडगाव घेनंद, कळूस कोरेगाव बुद्रुक, खुर्द आदी गावांमध्ये कालव्याने बाधित असलेले हवेली शिरूर, दौंड व इतर तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांची पुनर्वसनासाठी घेतलेली जमीन शेतकऱ्यांना पुन्हा देण्यात आली; परंतु खेड तालुक्यातील पुनर्वसनासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीवरील शिक्के अद्यापही काढले नाहीत. म्हणजेच या कालव्याच्या पुर्नवसित शेतकऱ्यांना कसलाच मोबदला मिळाला नाही, लाभ मिळाला नाही. म्हणून सातबारावरील शिक्के तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कुणबी मराठा संघाचे अध्यक्ष आबासाहेब कड यांनी केली.