केंद्र सरकारचेही दुर्लक्ष : पंचनामे झाले मात्र, मदत काही मिळेना; बळीराजा झाला हवालदिल
मंचर – शेतातील पिकांचे परतीच्या पावसाने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण होत आले असून आता सरकारी मदतीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या खेळामुळे आर्थिक मदत शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून ही रक्कम तुटपुंजी आहे. शेतकऱ्याला एकरी 20 ते 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर म्हणाले की, परतीच्या पावसामुळे संपूर्ण पीक वाया गेले आहे. खरिपातील पिके वाया गेल्यामुळे रब्बीचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर भरीव स्वरुपाची मदत सरकारने शेतकऱ्यांना दिली पाहिजे.
राज्य सरकारची परिस्थिती पाहता केवळ राज्य सरकारकडून भरीव मदत मिळणे शक्य नाही, अशावेळी केंद्र सरकारने मोठी मदत राज्य सरकारला केली पाहिजे आणि या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठा वाटा उचलला पाहिजे.
राज्यातील कराची रक्कम जीएसटीच्या रुपाने 50 टक्के वाटा हा केंद्राकडे देखील जात असतो. मुंबई शहरातून देखील कररुपाने मोठी रक्कम केंद्र सरकारकडे जात असते, त्यामुळे या कराचा वाटा केंद्र सरकारने राज्याला दिला पाहिजे. राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील प्रथक फिरकले नाही. त्यामुळे केंद्र सरकार या संकटकाळी मदत करते किंवा नाही अशी ही, शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. याआधी देखील केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत सापत्न वागणूक दिली आहे.
मागील पाच वर्षांत राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असताना देखील महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारने फारशी मदत केलेली नाही. यावेळी मात्र राज्य सरकार बरोबर केंद्र सरकारने देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठा वाटा उचलला पाहिजे. अन्यथा केंद्र सरकार महाराष्ट्राबाबत दुजाभाव करीत आहे, असा संदेश शेतकऱ्यांत जाईल. केंद्र सरकारने जर या संकट काळात भरीव मदत केली नाही. तर केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल व केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा बांगर यांनी दिला आहे.