पाणी बंदमुळे नीरा डावा कालव्यावर अवलंबुन असलेल्या कृषी अर्थकारणाचा कणा मोडला जाण्याची भीती
बारामती – नीरा डावा कालव्याची दोन आवर्तने कमी झाली, तर या पाण्यावर अवलंबून कृषी अर्थकारणाचा कणाच मोडून जाईल, शेतकऱ्यांना अशा स्थितीत आत्महत्येशिवाय मार्गच राहणार नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. 20) व्यक्त केल्या.
नीरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील समान न्याय तत्त्वावर पाणी मिळाले नाही तर तिन्ही तालुक्यातील शेतकरी आंदोलन उभे करतील, असा इशारा गुरुवारी (दि. 20) नीरा डावा कालवा संघर्ष समितीने तहसीलदार विजया पाटील यांना निवेदनातद्वारे इशारा दिला आहे. दरम्यान सोमवारी (दि. 24) प्रशासकीय इमारतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शेतकरी करणार आहेत. मुंबईला जाऊन वरिष्ठ मंत्र्यांना भेटून याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली जाणार आहे, यातून मार्ग निघाला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचे बारामतीत झालेल्या गुरुवारी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. नीरा कालवा संघात झालेल्या बैठकीत वसंत घनवट, राजेंद्र ढवाण पाटील, सतीश काकडे, कुलभूषण कोकरे, अमरसिंह जगताप, राहुल तावरे, बाळासाहेब देवकाते, पोपटराव तुपे, बाबूराव चव्हाण, भारत गावडे, संदीप चोपडे, सचिन सातव, मदनराव देवकाते, ऍड. नितीन कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्तकेल्या. पक्षीय मतभेद बाजूला सारुन बारामती, इंदापूर व पुरंदर या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रश्नावर लढा उभा करण्याचे आज निश्चित करण्यात आले.
निवेदनात नमूद की…
नीरा देवघर धरणाचे पाणी सध्या विकसीत लाक्षक्षेत्रास दिल्यानंतर उर्वरित पाणी समान न्याय पद्धतीने नीरा उजवा व डावा कालव्यास मिळावे, 2005 च्या कायद्यान्वये समन्याय पद्धतीने नीरा डावा कालव्याचे शिल्लक 1.85 टीएमसी पाणी मिळावे नीरा देवघर व खडकवासला दोन्ही धरणांचे पाणी नीरा डावा कालव्यासाठी मिळणार नसल्याने उन्हाळी दोन आवर्तने मिळणार नाहीत, पर्यायाने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतील यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होईल, पशुधन व दुग्धव्यवसायावर विपरीत परिणाम होईल नीरा डावा कालव्यावरील पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून ग्रामस्थांना फटका बसेल या पाण्यावर आधारित अनेक लघुव्यवसाय अडचणीत येतील, अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल अवर्षण तालुक्यांचे पाणी बंद करुन शेतकरी अधिकच अडचणीत येईल.