विजयसिंह मोहिते पाटील यांनी मध्यस्ती करत प्रश्न सोडविला
अकलूज-नीरा नदीवर असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या दरवाज्याचे निकृष्ट काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई करू व तातडीने पाणी गळती थांबवू असे ठोस आश्वासन दिल्याने आनंदनगर (ता. माळशिरस) येथील बंधाऱ्यावर मोहिते पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.
येथील बंधाऱ्याच्या दरवाजांचे काम निकृष्ट झाल्यामुळे नदीतील पाणी वाहून गेले. पाऊस चांगला होऊनही शेतकऱ्यांवर पाणी टंचाईची वेळ आली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सहा गावच्या शेतकऱ्यांनी धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंधाऱ्यावरच बेमुदत ऊपोषण सुरु केले होते. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडके, उपअभियंता अमोल मस्कर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पूर्वी ज्या ठेकेदाराने निकृष्ट पध्दतीचे काम केले होते, त्याच्या कामाचे बिल अडवून त्याच्यावर कारवाई करुन, तातडीने नवीन दरवाजे बसविण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची गळती रोखू व नवनी दरवाजे बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मध्यस्ती करुन उपोषण सोडविल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, दत्ता घोगरे, दत्तात्रय शिंदे, वसंत गायकवाड, रामचंद्र गायकवाड, राजेंद्र काटकर व शेतकरी उपस्थित होते.