पुणे- बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्य बाजारासह चारीही उपबाजार सुरू आहेत. या बाजारात शेतीमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसल्याही परवाना अथवा ओळखपत्राची आवश्यकता नाही. केवळ खरेदीदारांकडे परवाना असणे आवश्यक असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
सोमवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजारात 480 गाड्यांमधून 13 हजार 800 क्विंटल शेतीमालाची आवक झाली. तर, मोशी उपबाजार येते 190 गाड्यांम्धून 3 हजार क्विंटल, खडकी उपबाजार येथे 8 गाड्यातून 100 क्विंटल आणि उत्तमनगर उपबाजार येथे 14 गाड्यातून 50 क्विंटल शेतीमालाची आवक झाली. साप्ताहिक सुट्टीमुळे मांजरी उपबाजार आज बंद होता. मुख्य बाजारात रात्री नऊपासून पहाटे पाचपर्यंत शेतीमालाची आवक होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी केवळ परवानाधारक खरेदीदाराला भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात प्रवेश दिला जात आहे.
गर्दी होऊन यासाठी परवाना आणि ओळखपत्र पाहून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. घरगुती अथवा एकद-दोन किलोच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मात्र बाजारात प्रवेश देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना परवाना असल्याशिवाय बाजारात खरेदीसाठी माल आणता येत नाही, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वास्तविक शेतकऱ्यांना बाजारात शेतीमाल विक्रीसाठी आणण्याकरिता कोणत्याही परवान्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी बिनधास्त माल विक्रीस आणावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. काही अडचण आल्यास थेट बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.