वाई – जिल्ह्याच्या विविध भागातील जनता सध्या दुष्काळाचे चटके सोसत आहे. वाई तालुक्यातील बावधनसह 12 वाड्यांमध्येही सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे या गावांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या नागेवाडी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी बावधनसह 12 वाड्यांमधील ग्रामस्थांमधून होत आहे.
वाई तालुक्यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे धरण आहे. या धरणात पाव टीएमसी पाणी साठवले जाते. नागेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर धरणातून पाणीपुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नागेवाडीच्या धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास उन्हाळ्यातील पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पीक वाया गेल्याने आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बावधनसह बारा वाड्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यातच नागेवाडी धरणाला तीन ते चार ठिकाणी गळती लागल्याने पाणी वाया जात आहे, तरीही नागेवाडी पाटबंधारे खात्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.