अनेकजण अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत : कागदांवर मात्र मदत पूर्ण
पुणे – जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यात हवेली, वेल्हा, पुरंदर आणि बारामतीवगळात सर्व तहसीलदारांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के वाटप केल्याचा अहवाल देखील दिला. परंतु, अजूनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेत पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सोबतच जनावरे, शेत तळी, शेतीचे बांध, घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासाठी 39 कोटी 55 लाख रुपये, तर महाआघाडी सरकारने मदतीचा दुसरा हप्त्योपोटी 86 कोटी 44 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना मागणीनुसार निधीचे वाटप केले. तहसीलदारांनी जानेवारी-2020 अखेर शंभर टक्के निधी वाटप केल्याचा अहवाल दिला. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.